ग्रामीण महाराष्ट्र न्यूज : विशेष
जगामध्ये, देशामध्ये कोरोना विषाणू थैमान घालत आहे. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत इंदापूर तालुक्यातील श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या महाराष्ट्र राज्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक शहरांमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, खेडोपाडी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. ज्या भागामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्याठिकाणी तेथील नागरिकांचा रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने या रक्तदान शिबीरातून जमा करण्यात आलेले रक्त इंदापूर, पुणे, बारामती, बीड, दौंड, बार्शी सोलापूर, कुर्डूवाडी, करमाळा, अकलूज, पंढरपूर या शहरांमधील आजपर्यंत जवळपास ४५० पेक्षा जास्त रक्ताची बॅग गोर-गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिली असून ट्रस्टची ही संकल्पना शंभर टक्के यशस्वी झाली असल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भूषण सुर्वे यांनी ग्रामीण महाराष्ट्र न्यूज शी बोलताना सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यामध्ये जी रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आली यामध्ये भगवानराव भरणे प्रतिष्ठान, प्रवीण भैय्या माने युवा मंच, भारतीय जैन संघटना, लोकसेवक गणपतराव आवटे फाउंडेशन, ह्यूमन राइट्स फाउंडेशन, योद्धा प्रोडक्शन यांचेही मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.